ताडोबातील महाल आणि उडणाऱ्या मगरी भाग एक

 

ताडोबातील महाल आणि उडणाऱ्या मगरी

भाग एक

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाचं जंगल सर्वांना ठाऊक आहे. या जंगलात खूप वाघ आहेत. रानगवे आहेत. हरणांचे कळप आहेत. विषारी साप आहेत. मोर आहेत. असंख्य पक्षी आहेत. जंगलाच्या मध्यभागी एक विस्तीर्ण तलाव आहे. या तलावाच्या अवतीभवती खूप पशुपक्षी पिण्याच्या पाण्यासाठी घुटमळत असतात.

या जंगलाच्या खूप आत आणखी एक घनदाट जंगल आहे. त्याचा रस्ता तलावाच्या विरुध्द असलेल्या एका छोट्याशा पायवाटेने जातो. अरुंद अशी पायवाट बघता बघता प्रचंड मोठी होते. या पायवाटेच्या दोन्ही बाजूंना अत्यंत दाटीवाटीने चित्रविचित्र आकाराचे वृक्ष उभे आहेत. या झाडांच्यामध्ये वेली उगवल्या आहेत. ऑक्टोपसासारख्या या वेली रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेल्या आहेत. एखाद्याचे पाऊल या वेलीवर पडले तर त्याला या वेली गुंडाळून टाकतात आणि सर्वात उंच झाडाच्या टोकावर नेऊन ठेवतात. वर बघितलं तर थरथर करायला लावणारी भीती. कारण त्या झाडाच्या वर दशमुखी नाग तीक्ष्ण नजरेनं सर्वत्र बघत असतो. खाली बघितलं तर त्याहून मोठी भीती. कारण खाली वेलींच्यामध्ये कोब्रा नागोबा आणि रसेल व्हायपर वेटोळे घालून बसलेले. दोघेही जाम विषारी. त्यांनी केवळ हिस्स केलं तरी त्यातून उडणाऱ्या विषामुळे होत्याचे नव्हते व्हायचे.

अंगावर शहारे आणणाऱ्या या आडवाटेच्या पायवाटेनं २५ मैल चालून गेल्यावर अंधाराचा बोगदा सुरु होतो. त्यात प्रकाशाला शिरायला काही जागाच नाही. या अंधाऱ्या बोगद्यात एखाद्याने प्रकाश आणणाच्या विचार जरी केला तरी हा अंधार त्याला खाउुन टाकतो.

या अंधाऱ्या बोगद्याला प्रसन्न करण्याची युक्ती फक्त, या अंधारी बोगद्याच्या प्रारंभी राहणाऱ्या दैत्याकडे आहे. या दैत्याला शंभर मुखं होती. आता ती ४६ च राहिली आहेत. कारण बोगद्याच्या अंधारात प्रकाश आणण्याची युक्ती कुणाला सांगितली की त्याचे एक मुख नष्ट होते. ते मुख या अंधारी बोगद्यात वेगाने जाते. स्वत:ला आग लावून अतिवेगाने बाहेर पडते. या दैत्याच्या नजरेसमोर जळून खाक होते. त्यामुळे अंधाराला प्रकाशमान करण्याची युक्ती हा दैत्य कुणालाच सांगत नाही. पण कधीकधी तो आमिषाला बळी पडतो. आतापर्यंत तो ४६ वेळा या आमिषाला बळी पडल्याने त्याचे ४६ मुख त्याच्या नजरेदेखत नष्ट झाले. त्यामुळे आता तो सदैव सावध राहतो.

एकदा त्याने दशमुखे रावण महाराजांना नकार दिला. तेव्हा दोघांमध्ये तुंबळ युध्द झाले. या युध्दात रावणाचा दारुण पराभव झाला. अंधारलेला बोगदा दैत्याच्या मदतीला धावून आला. गुहेतला अंधार बाहेर आला. त्यामुळे दशाननाला काहीच दिसेना. दैत्याने त्याचे मुसके बांधले. त्याला तो ठार करणार तोच तिथे दैत्यगुरु शुक्राचार्य प्रगटले. त्यांनी त्या दैत्यापासासून रावणास कसेबसे वाचवले. शुक्राचार्यांनी त्या दैत्याला अजरामर होण्याचा वर दिला. शिवाय ज्या दिवशी त्याचे शेवटचं मुख गळून पडेल त्या दिवशी तो ब्रम्हांडाचा राजा बनेल असा वर दिला. दैत्य आनंदला. त्याने शुक्राचार्यांना विचारलं, हे कधी होणार?

ते उत्तरले, एक लक्ष प्रकाश वर्षांनी.

या आनंदात त्या दैत्याने दशानन रावण आणि शुक्राचार्यांना जाऊ दिले. यापुढे नको ते साहस करु नकोस, नसता तुझ्या अंगलटी येईल, असा सावधानतेचा इशाराही त्याने रावणाला दिला. त्यावेळी रावणाने कबूल करुनही पुढे हा सल्ला तो विसरुन गेला आणि त्याने स्वत:ची माती करुन घेतली.

तर अशा या दैत्य संरक्षित अंधारी बोगद्याच्या पलिकडे एक प्रचंड भव्य किल्ला आहे. किती भव्य तर आपला चंद्र मावेल इतका. या किल्याभोवती प्रचंड मोठी तटबंदी आहे. या किल्यात राजवाडा आहे. त्या राजवाड्याच्या भोवती ५० हजार विहिरी आहेत. या विहिरींमध्ये अजस्त्र मगरी आहेत. या मगरींना उडता येतं. या राजवाडयाकडे कुणी येणाचा प्रयत्न जरी केला तरी या ५० हजार विहिरींमधील ५०० मगरी आकाशात भरारी घेउुन राजवाड्याकडे निघालेल्या व्यक्तिच्या पायाला गचकन चावतात, त्यामुळे ती व्यक्ती जायबंदी होते. ती पुढे जाऊ शकत नाही. या उडणाऱ्या मगरींनी राजवाडयापर्यंत आजपर्यंत कुणालाच जाऊ दिलेलं नाही. डेकाराबिया, कुकुध, मेमिस्टोफेलेस, पझूझू, रांगडा, शिनिगामी, टिटिव्हिलस, टुटुलचा, वेंडिगो, झेपार या दैत्य राजांनी वेळोवळी प्रयत्न केला, पण त्यांना अजिबात यश मिळाले नाही. हे दैत्यराजे याच ठिकणी पूर्णपणे नेस्तनाबूत झाले. त्यामुळे ताडोबाच्या जंगलाच्या आत असलेल्या घनदाट जंगलातील राजवाड्याचे रहस्य गेल्या ५० हजार वर्षापासून कायम आहे.

पण, तुला हे कसं ठाऊक. अंधाऱ्या बोगद्याचा बाहेर असणारा दैत्य, तुझा काका लागत नाही. तुला एका सेकंदासाठी जर लाईट गेली तरी तुझी पँट ओली होते, तेव्हा तुला तो दैत्य  अंधाऱ्या बोगद्यात प्रकाश आणण्याचे गुपित सांगेल, हे आजपासून एक हजार वर्षांनीच शक्य होईल. असं रवी स्वत:लाच उपहासाने म्हणाला.

हे बघ तुझा उपहास मला कळत नाही असं समजू नकोस. त्याचा आनंद तू नंतर घे. आधी ताडोबाच्या जंगलाच्या आत असलेल्या राजवाड्याच्या रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करु या.

अरे गाढवा, तुझ्याच सांगण्याप्रमाणे जर दशानान रावण  आणि दैत्यांच्या सम्राटांना या राजवाडयापर्यंत जाणे जमले नाही तर तुझी हैसियत तर कडूलिंबाच्या पत्याइतकी सुध्दा नाही.

अरे, पण तू असल्या फोका कां ताणतोस.

यात कसली आली आहे फोक...

हॅरी पॉटर जर, पावने दहा नंबरच्या प्लॅटफार्मवर येणाऱ्या गाडीत बसून कुणालाही न दिसणाऱ्या हॅगवार्ट शाळेत जाऊ शकण्याच्या कथनावर, तू विश्वास ठेवलास की नाही...

ठेवला नं..

जर ते शक्य आहे, तर मग हे शक्य का नाही.

जगात काहीही अशक्य नाही असं विज्ञानाच्या सरांनी आतापर्यंत १०० वेळी सांगितलं की नाही..

हो... (अपूर्ण)

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!